७५ वर्षांचा भव्यदिव्य इतिहास..... इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी....। .
1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि भारताची शैक्षणिक वाटचाल सुरू झाली. 1947 नंतरचा कालखंड भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. पुन्हा नव्याने सुरुवात! याच कालखंडात निजामाच्या राजवटीत मराठवाडा असताना 1949 मध्ये छत्रपती संभाजीनगर, तत्कालीन औरंगाबाद येथे शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत विचारवंतांनी एकत्र येऊन ' माँटेसोरी शिक्षण संस्था' स्थापन केली. 'मराठवाड्यातील पहिली बालवाडी ही ' माँटेसोरी बालक मंदिर' शिक्षण संस्थेने दिली . कै.चंद्रावती राजे राजवाडे या संस्थेच्या संस्थापक होय. सुरुवातीच्या काळात प्राथमिक विभागापासून सुरू झालेली ही शाळा आज दहावीपर्यंतची छ. संभाजीनगर शहरातील सर्वात नावाजलेली गुणवत्तापूर्ण शाळा आहे.
संस्थेचा इतिहास पाहिला तर अतिशय बोध घेण्यासारखा आहे. सामाजिक व आर्थिक परिस्थिती विस्कटलेली असताना शैक्षणिक पाठबळ भक्कम व्हावे यासाठी संस्थेच्या मान्यवरांनी एक गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित शिक्षण पद्धती समाजाला देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना अगदी महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर इमारत घेऊन शहागंज येथे शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. 'समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पवित्र कार्य संस्थेची पवित्र वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या सभासदांमध्ये लाभलेले मान्यवर अतिशय विद्याविभूषित असल्याने येथील सुरुवातीपासूनचे शिक्षक सुद्धा विषयप्रभुत्व असणारे तसेच कार्य तत्पर व कर्तव्यदक्ष आहेत. आनंदाने काम आणि कामातून आनंद असे येथील शिक्षकवृंद काम करत असतात. शिक्षण पद्धतीत सृजनशीलता आणून नवोपक्रमांची जोड देत इथे विद्यादान होत असते. शाळेची भूमिका ही विद्यार्थ्यांना फक्त दर्जेदार शिक्षण देऊन पूर्ण होत नाही तर शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सुसंस्कृत असावा यावर अधिक भर दिला जातो. आम्ही मुलांचा केवळ बौद्धिक नव्हे तर आकलन, उपयोजन, सृजनशीलता, कल्पकता अशा क्षमतांचा परिपूर्ण विकास व्हावा याबरोबरच शारीरिक व भावनिक अंगांचा परिपोष व्हावा हे व्यापक उद्दिष्ट ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची हमी देत आहोत.
देशाची भावी पिढी संस्कारित करण्यात आमचा खारीचा वाटा आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. संस्थेचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा या विभागात सुद्धा देश पातळीवर झेंडा रोवत आहेत. माँटेसोरी शिक्षण संस्था शिक्षणातील उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक विभागासाठी 1998 मध्येच संगणकाचे महत्त्व ओळखून दहा संगणक संच वातानुकूलित,वर्ग आठवी,नववी,दहावी साठी सुरू केले.विद्यार्थी संख्येचा विचार केल्यास बालवर्ग - 300, प्राथमिक विभाग पहिली ते सातवी -जवळपास 1300 विद्यार्थी, माध्यमिक विभाग - आनंद कृष्ण वाघमारे प्रशाला -600 विद्यार्थी असे जवळजवळ 2200 विद्यार्थी व एकूण 120 कर्मचारी एवढे मोठे कुटुंब संस्थेचे आहे. 'सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा, सत्संगती ना ही भ्रष्ट हो, जरी संकटे आली किती,' अशा पथाची पायवाट ही संस्था आजतागायत करत आहे.
Saraswati Colony West, Gulmandi,
Aurangpura, Aurangabad, Maharashtra 431001